बुलडाणा – 2021 – 22 वर्षासाठीचा पिकांच्या हमी भावात मोदी सरकारने मोठी वाढ करून शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. आघाडी सरकारने आता कापूस, धान, तूर आदी पिकांच्या खरेदीची कार्यक्षम यंत्रणा तयार करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष आ. आकाश फुंडकर यांनी केली आहे.
हमी भावाने केली जाणारी (एमएसपी) खरेदी व्यवस्था मोदी सरकार संपवणार आहे , असा प्रचार विरोधकांनी केला होता. मोदी सरकारने पिकांच्या हमी भावामध्ये मोठी वाढ केल्यामुळे विरोधक तोंडावर आपटले आहेत. मोदी सरकारने कापसाला आजवरचा सर्वोच्च हमी भाव जाहीर केला आहे.या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी मोदी सरकारचे अभिनंदन करत आहे.

आता राज्य सरकारने कापूस, तूर, धान, सोयाबीन आदी पिकांच्या खरेदी केंद्रांची व्यवस्था तातडीने तयारकरण्यात यावी हि आमची मागणी आहे.गेल्या वर्षी कापूस, भात, सोयाबीन, तूर खरेदीची केंद्रे वेळेत सुरू न झाल्याने शेतकर्यांना अनेक अडचणी व गैरसोयींना तोंड द्यावे लागले होते.या वर्षी तरी आघाडी सरकारने या पिकांच्या खरेदी केंद्रांची कार्यक्षम यंत्रणा तयार करावी, असेही आ. आकाश फुंडकर यांनी पत्रकात नमूद केले आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत तिळाच्या हमी भावात सर्वाधिक ( 452 रुपये प्रती क्विंटल) वाढ करण्यात आली आहे. तूर आणि उडीदाच्या आधारभूत किमतीत प्रती क्विंटल 300 रुपये वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांमुळे केंद्र सरकारकडून केली जाणारी गहू , तांदूळ व अन्य शेतमालाची खरेदी बंद होईल असा प्रचार दिल्लीतील आंदोलकांनी केला होता. मात्र 10 एप्रिल ते 14 मे या काळात पंजाब , मध्य प्रदेश , हरियाणा , उत्तर प्रदेश या राज्यातून गव्हाची विक्रमी खरेदी झाली आहे. पंजाब – 132. 10 लाख मेट्रिक टन, मध्य प्रदेश – 106 . 34 लाख मेट्रिक टन , 20-21- ,हरियाना 82 लाख , उत्तर प्रदेश 24 लाख मेट्रिक टन अशी एकूण 366.61 लाख मेट्रीक टन एवढी गव्हाची खरेदी करण्यात आली. गेल्या वर्षी झालेल्या खरेदीपेक्षा यावर्षीची खरेदी 30 टक्क्यांनी जास्त आहे. या खरेदीपोटी 31 लाख शेतकर्यांच्या बँक खात्यात 72 हजार कोटी थेट जमा झाले आहेत, असेही आ. अॅड. आकाश फुंडकर यांनी पत्रकात म्हटले आहे.